काळही भरू न शकणारी अजित दादांच्या जाण्याची जखम.!
‘टाइम हील्स एव्हरीथिंग’ (Time heals everything) असा एक इंग्रजी वाक्यप्रचार आहे. म्हणजे 'काळ' हा प्रत्येक जखमेवरचा उत्तम उपाय असतो, मात्र, अजित दादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आणि झालेली जखम काही काळाच्या ओघात पुसट होण्याची शक्यता अजिबात दिसत नाहीये. उलटपक्षी, मी तर असं म्हणेन की, जसा काळ पुढे सरकतोय, तशी ती जखम अधिक चिघळत चालली आहे आणि त्याला कारणंही आहेत. मी स्वतः एक बारामतीकर म्हणून हे जवळून अनुभवलेलं आहे. बारामतीकरांच्या आयुष्यातली कुठलीही समस्या असो, प्रत्येक बारामतीकराला मनापासून वाटायचं की, एकदा का दादांना भेटलो आणि त्यांच्या हातात निवेदन दिलं, की आपला प्रश्न मार्गी लागलाच म्हणून समजा.! मग ते कुणाचे अडकलेले उसने पैसे असोत, कुणा सावकारी-गुंडांचा त्रास असो, सार्वजनिक काम असो वा व्यक्तिगत काम असो... प्रत्येक बारामतीकराला दादांचा मोठा आधार होता. मात्र, आज दादांच्या जाण्याने एक हात मोडल्याची जी भावना आहे, ती प्रत्येक बारामतीकराच्या मनात घर करून आहे. फक्त बारामतीकरच कशाला, संपूर्ण पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र आज या भावनेला आणि दादांच्या अस्तित्वाला मिस करतोय. ...