देव घरी येतो ही गणेशोत्सवाची अलौकिक भावना.!
देव घरी येतो ही गणेशोत्सवाची अलौकिक भावना.! "देव स्वतः पाहुणा बनून आपल्या घरी येतो..." विचार करा, ही भावनाच किती अलौकिक आणि सुंदर आहे! आपल्या वारकरी संप्रदायात संत ज्ञानेश्वर महाराज, त्यांनी "हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी..." असं सांगत नामस्मरणाचे अथांग महत्त्व पटवून दिले. केवळ हिंदू धर्मातच नाही, तर मुस्लिम धर्मात 'तस्बीह' (नामस्मरण) असो वा जगातील इतर अनेक धर्मांत, ईश्वराचे नाव घेण्याला विशेष स्थान आहे. आपण देवाची प्रार्थना करतो, त्याची पूजा करतो, त्याच्या मंदिरात जातो... पण 'स्वतः देवच चालून आपल्या घरी येतो', असा सोहळा अनुभवण्याची संधी मिळणे ही अत्यंत विरळ आणि अद्भूत गोष्ट आहे! आणि हीच अलौकिक अनुभूती गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण दरवर्षी घेतो. गणपती बाप्पा येण्यापूर्वीचे घरातील वातावरण आणि बाप्पा स्थानापन्न झाल्यानंतरचे वातावरण... यातला फरक तुम्ही कधी अनुभवलाय का? तो फरक शब्दांत सांगणे कठीण आहे! तुम्ही अगदी कडक उन्हाळ्यात, मे महिन्यात घरात सुरेख मखर सजवले, आरास केली, धूप-अगरबत्त्या लावल्या आणि बाजारातून एखादी गणपतीची म...